“अजितदादा अन् आमच्यात दुरावा नाही पण, त्यांनी आमच्या..” मोहिते पाटलांनी क्लिअरच केलं

Dhairyasheel Mohite Patil : ‘सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांनी अजितदादांचा (Dhairyasheel Mohite Patil) उपयोग करुन घेतला. नंतर त्यांना सोडून गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेनं या लोकांना उत्तर दिलं आहेच. विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांचा कधी राजकीय संघर्ष होता असं मला वाटत नाही. त्यांच्यात आणि आमच्यात कोणताही दुरावा नाही. पण आमच्या हक्काचं पाणी अजित पवारांनी काही प्रमाणात नेलेलं आहे. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. कुणाच्याही हिश्श्याचं पाणी काढून न घेता आणखी कसं देता येईल यावर नियोजन करावं’, अशी अपेक्षा शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.
लेट्सअप मराठीच्या विशेष मुलाखतीत खा. मोहिते पाटील बोलत होते. नीरा कालव्याच्या पाणी वाटपाचा मुद्दा माजी खासदार रणजित निंबाळकर यांनी उपस्थित केला होता. त्यानुसार त्यांनी पाणीवाटप 2019 च्या आधी बदलून घेतलं असा दावाही केला होता. नंतर अजित पवार सत्तेत आल्यानंतर ते पाणीवाटप पुन्हा बदललं. त्याची वस्तु्स्थिती नेमकी काय आहे असे विचारलं असता मोहिते पाटील म्हणाले, 1980 च्या दशकात विजयसिंह मोहिते पाटील उपमंत्री असताना नीरा देवधरची फाइल त्यांच्याकडे मंजुरीसाठी आली होती. पण त्या फाइलवर त्यांनी सही केली नाही. त्यावर निलंगेकर साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादांकडे तक्रार केली होती. त्यावर दोघांना बोलावलं. सही का करत नाही म्हणून विजयदादांना विचारणा झाली.
Video : खासदार म्हणून एक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी काय केल; मोहिते पाटलांनी यादीच वाचली
त्यावर विजयदादा म्हणाले, नीरा व्हॅलीत फलटण, माळशिरस, शिराळा, बारामती आणि इंदापूरचा काही भाग आहे. पण यात माळशिरस तालुका वगळला म्हणून मी सही केली नाही. नंतर यात माळशिरस तालुक्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर धरणाचं भूमिपूजन झालं. पाण्याचं वाटप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण पाण्यावरुन कोणताही संघर्ष होता कामा नये. आमच्या हक्काचं पाणी काही प्रमाणात अजितदादांनी नेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. पण आता ते उपमुख्यमंत्री आहेत. कुणाच्याही हिश्श्याचं पाणी काढून न घेता आणखी कसं देता येईल यावर नियोजन करावं.
अजितदादांचा काही लोकांनी उपयोग केला
विजयसिंह मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यात राजकीय संघर्ष राहिला. यामुळे मोहिते पाटलांना थोडं बॅकफूटवर जावं लागलं ही वस्तूस्थिती आहे का या प्रश्नावर उत्तर देताना मोहिते पाटील म्हणाले, ‘विजयदादा आणि अजितदादा यांचा थेट राजकीय संघर्ष कधी राहिला आहे असं मला वाटत नाही. अजितदादांचा उपयोग जिल्ह्यातील काही लोकांनी करुन घेतला. त्याचं उत्तर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनं दिलं आहे. जिल्ह्याचं काय नुकसान झालं हे जिल्ह्यानं पाहिलंही आहे. अजितदादांचा ज्या लोकांनी उपयोग करुन घेतला आणि नंतर त्यांना सोडून गेले त्या लोकांना सोलापूरच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सडेतोड उत्तर दिलं आहे.’
तुमचे प्रतिस्पर्धी रणजित निंबाळकर यांना तुमचा काय सल्ला राहील. त्यांचे थेट फडणवीसांशी संपर्क असल्याचं सांगितलं जातं यावर मोहिते पाटील म्हणाले, ‘त्यांचा फडणवीसांशी थेट संपर्क असूही शकतो. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हा सगळ्यांचा पालक असतो. फडणवीस साहेब सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. आतापर्यंत जितके मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्याकडे एखादा आमदार, खासदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता चांगले प्रोजेक्ट घेऊन गेला तर पक्षीय भेद बाजूला ठेऊन प्रोजेक्ट पुढे घेऊन गेले आहेत.’
‘मोठ्या लोकांची नावं घेऊन गल्लीत कालवा करण्याची सवय काही लोकांना लागली आहे. स्वतःचं कर्तुत्व झाकण्यासाठी काहीतरी पसरवत राहायचं. ह्यांनी आतापर्यंत कोणता प्रोजेक्ट किंवा काम आणलं हे तर सांगावं. पाच वर्षात एक लाख कोटी निधी आणला असं सांगणारी मंडळी आहेत मग हा निधी गेला कुठं? कारण सोलापूर जिल्ह्यात जी विकासाची कामं झाली आहेत ती विजयसिंह मोहिते पाटलांच्या काळात झाली आहेत. याचं उत्तर त्यांना जनतेनं दिलं आहेच.’
शिवसेना फुटण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी यांचाही.. शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा गौप्यस्पोट
अजितदादांची आणि तुमची कधी भेट झाली आहे का यावर मोहिते पाटील म्हणाले, ‘अजितदादा आणि माझी पुण्यात एका लग्नात गाठ पडली होती. त्याच्यापलीकडे भेट कधी झाली नाही. माझं कधी त्यांच्याकडे काम पडलं नाही. पण वेळ पडली तर नक्की जाईल. कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा नाही. दुरावा असण्याचं काही कारणही नाही.’